अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी दिलेल्या निर्णयानंतर त्यासंदर्भातील पाऊले उचलण्यास राज्य सरकारने सुरुवात केली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शक्यतो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार असल्याचेही त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, पण ती परीक्षा होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्याचबरोबर परीक्षा घेतल्याशिवाय राज्य विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, ३१ ऑक्टोबरपर्यंत युजीसीकडे मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. ही मागणी युजीसीने मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा नेमकी कधी सुरु होईल अशी शंका आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितले होते की, आज परीक्षा जाहीर केली आणि उद्या घेतली असे होणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूर्ण सप्टेंबर महिना दिला जाईल आणि परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील, असं उदय सामंत यांनी सांगितले आहे.

घराबाहेर पडून केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही, यासंबंधी कुलगुरुंकडे विनंती करण्यात आली असून त्यावरही चर्चा झाली. शारिरीक आणि मानसिक त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे, अशी पुन्हा विनंती कऱण्यात आली. त्यानुसार पेडणेकर समिती चांगल्या पद्धतीने काम करत असून कार्यवाही करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

बैठक आणि चर्चेसाठी अजून एक दिवस देण्याची विनंती कुलगुरु आणि समितीच्या लोकांनी केली असून परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्या लागतील यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर सरकारकडे दुसरा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. परीक्षांसाठी विद्यार्थी घराबाहेर पडणार नाही, परीक्षा घरातूनच देता आली पाहिजे, यावर कुलगुरुंचे एकमत झाले आहे. कोरोना संकटात ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे फार जिकीरीचे काम आहे. पण योग्य पद्धतीने कुलगुरु हे पार पाडतील याबद्दल आशा असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.