हिंदीत बोलण्याचा हट्ट धरणाऱ्या एअरटेल कर्मचाऱ्याला मनसेने घडवली अद्दल


मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मराठी ही मातृभाषा आहे, त्याचबरोबर मराठी भाषा महाराष्ट्रभर देखील बोलली जाते. पण मायानगरी मुंबईत परराज्यातील नागरिकांकडून अनेकदा मराठी बोलण्यास नकार दिला जातो. त्यातच लाखो अमराठी भाषिकांचे मुंबई घर चालवते. त्यामुळे, मराठी भाषा शिकून अनेकांनी येथील संस्कृती जपली आहे. पण, मराठी बोलण्यास काहीजण जाणीवपूर्वक नकार देत असल्यामुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या अमराठींना कायमच मराठीचा धडा शिकवला जातो. मनसे मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही असते, महाराष्ट्रात राहणाऱ्याला प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे. महाराष्ट्रात राहून मला मराठी बोलता येत नाही आणि तुम्ही हिंदीत बोला हे चालणार नाही. त्यातच मुंबईतील दुकानांचे साईन बोर्ड देखील मनसेने मराठी करायला लावले. त्याचबरोबर त्या आस्थापनेत काम करणाऱ्यांना देखील मराठी यायलाच हवी, असे मनसेकडून ठणकावून सांगितले जाते.

दरम्यान मुंबईतील बोरीवली मतदारसंघातील एअरटेल गॅलरीतील एका कर्मचाऱ्यास मनसे पदाधिकाऱ्यांनी अशाच मराठीद्वेषाबद्दल चांगलीच अद्दल घडवली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ आणि घडलेला प्रसंग मनसचे सरचिटणीस नयन कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. एक मराठी युवक बोरीवली येथील एअरटेल कंपनीच्या गॅलरीमध्ये आपल्या मोबाइलचे रिचार्ज करण्यासाठी गेला. त्याला रु. २४९/- चा रिचार्ज करायचा होता, त्यासाठी त्याने रु. ५००/- एरटेल कर्मचाऱ्याला देऊ केले आणि परतीचे रु. २५१/- अपेक्षित होते. परंतु एअरटेल कर्मचाऱ्याने १ रुपया कमी देऊन फक्त रु. २५०/- दिले. सदर युवकाने अयोग्य रक्कम परत मिळाल्याने विचारणा केल्यावर एअरटेल कर्मचाऱ्याने अगदी तुसड्या भावाने त्याचे परतीचे पैसे देणे नाकारले आणि वरून मला मराठी येत नाही, तू हिंदीत बोल, अशी मागणी केली व त्याने आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत त्या युवकासोबत वाद घातला. त्या एअरटेल गॅलरीमध्ये ५-६ कर्मचारी असूनसुद्धा त्यातील एकालाही मराठी येत नव्हती.

https://www.facebook.com/watch/?v=3766043376743161&extid=pUvb42SIO2onya57

यासंदर्भात मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांना सदर युवकाने फोन करून तक्रार सांगितल्यानंतर, कदम यांनी बोरिवली विधानसभेतील मनसैनिकांना तातडीने चारकोप येथील एअरटेल गॅलरीमध्ये त्या युवकासोबत पाठवले. तेथील काही कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला असे काहीही घडल्याचे नसल्याचे सांगितले. अखेर, मनसैनिकांनी आपला हिसका दाखवल्यानंतर सर्व गोष्टी कबूल केल्या व माफी मागितली. तेथील कर्मचाऱ्याने सरतेशेवटी सर्व कर्मचारी मराठीत बोलतील व त्यांना मराठी भाषा शिकवण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे कदम यांनी म्हटले आहे. पण यासंदर्भात एअरटेल कर्मचाऱ्याऐवजी मराठी युवकालाच स्थानिक पोलिसांनी दम दिल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.

मराठी भाषेचा मान जपण्यासाठी पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारदाराला, जर तुम्ही दाबत असाल व उलटे फटकारणार असाल तर पोलिसांकडे येणारच कोण? एअरटेलच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली पाहिजे होती. असे न करता पोलिसांनी विषय दाबण्याचा प्रयत्न केला. इतर पक्ष सहन मराठीचा अपमान करतील पण मनसे कधीच सहन करणार नसल्याचेही कदम यांनी म्हटले आहे.