सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो जिम आणि मंदिरांसंबंधी निर्णय – संजय राऊत


मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात मागील पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू असल्यामुळे देशासह राज्यातील धार्मिक स्थळे आणि जिम बंद आहेत. ती पुन्हा सुरु करावीत अशी मागणी विविध धार्मिक संघटना तसेच राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १५ ऑगस्टपासून जिम सुरु होतील, असे सांगितले होते. पण त्यानंतर त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अनलॉक ४ ला १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून त्यावेळी जिम आणि धार्मिकस्थळे सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना जिम, मंदिरं यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी आम्ही २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचे म्हटले आहे. आम्ही आमच्या वतीने सरकारला अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. सगळी मंदिरे १ तारखेपासून उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार आहोत. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचे असल्याचे एकप्रकारे आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिले आहे. त्याचबरोबर याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले होते.