ठाकरे सरकारने परवानगी दिली नाही तरी मशिदी उघडणार; इम्तियाज जलील यांचे आव्हान


औरंगाबाद – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे मागील 5 महिन्यापेक्षा जास्तकाळ बंद आहेत. त्यातच राज्यातील ठाकरे सरकारकडून इतर गोष्टींवरील निर्बंध कमी होत आहेत. त्याचप्रमाणे प्रार्थनास्थळे देखील पुन्हा उघडण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी वारंवार विविध संघटना तसेच राजकीय नेत्यांकडून होत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

आमच्या वतीने आम्ही राज्य सरकारला अल्टिमेटम देत आहोत. गणपती विसर्जन १ तारखेला आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. १ तारखेपासून सगळी मंदिरे उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार आहोत. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचे असल्याचे आव्हानच इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारला दिले आहे. यावेळी त्यांनी याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचेही सांगितले.