मंदिरे सुरू करण्यासाठीच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा – चंद्रकांत पाटील


मुंबई – महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने मंदिरे सुरू करा या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असून या आंदोलनात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभागी व्हावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच केंद्र सरकारने परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा महाराष्ट्रातील देवस्थाने सुरु करण्याची मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही.

विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करा या मागणीसाठी राज्यभर दार उघड उद्धवा दार उघड अशी हाक देत घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील,

त्याचबरोबर या आंदोलनात सहभागी होताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेस मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली आहे.