मुंबईच्या लोकल सुरु करण्याबाबत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री


मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील लोकल आणि ई पासबाबत सूचक वक्तव्य केले असून जगभरात ज्या काही गोष्टी इतर सर्वांनी घाईगडबडीत केल्या असतील, त्या चुका मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही, ज्या ज्या गोष्टी आपण सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या असल्यामुळे जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र घेणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले. याचाच अर्थ राज्यातील जनतेला मुंबई लोकल सुरू होण्यासाठी आणि ई पासची प्रक्रिया बंद होण्यासाठी आणखीन काही काळ वाट बघावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल ठाण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झाले होते. त्यांनी ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापलिकेची कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक तसेच ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीचे आयुक्त, स्थानिक आमदार, खासदार, महापौर यावेळी या बैठकीला उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मुंबई आणि आसपासच्या शहरात कमी झालेल्या कोरोना रुग्णांबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले. ठाणे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली परिसरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ङट होत आहे. पण असे असले तरी गाफील राहून चालणार नाही, हलगर्जीपणा करू नका असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

ठाणे शहरातील मुंब्रा प्रभाग समितीने ज्या प्रकारे कोरोनावर मात करण्यासाठी उपाय योजना राबवली त्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. त्याबाबत विशेष माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. त्याचबरोबर पालिका स्तरावर कोणकोणत्या गोष्टी यानंतर देखील करण्याची आवश्यकता आहे त्याचे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले. कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेत या पुढील काळात परिस्थिती नियंत्रणात येईल यासाठी काही नवीन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

यावेळी मुंबई ते ठाणे प्रवासात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याकडे देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. कोरोनामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष झाले असले तरी आता ती सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करा, रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे असे आदेश त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.