कोरोना चाचणीबाबत ठाकरे सरकारचा नवा आदेश


मुंबई : देशावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट अद्याप दूर झालेले नाही. त्यातच महाराष्ट्र या संकटाचा केंद्रबिंदू म्हणून समोर आला आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वोत्तोपरी खबरदारी घेतली जात आहे. पण आता राज्यातील ठाकरे सरकारने नागरिकांना तुमच्यात जर कोरोनाची लक्षणे असतील तरच चाचणी करावी, अशी सूचना केली आहे.

देशासह राज्यात मागील पाच महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे आता राज्य सरकारकडून मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉकची घोषणा करत उद्योगधंदे हळूहळू सुरू केले जात आहे. त्यातच राज्याअंतर्गत एसटी बस सेवाही सुरू झाली आहे. त्याचबरोबर बाजारपेठाही खुल्या करण्यात आल्यामुळे खबरदारी म्हणून सरसकट कोरोनाची चाचणी केली जात होती. पण, आता जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तरच त्याची चाचणी करण्यात यावी अशी सूचना राज्य सरकारने काढली आहे. जर व्यापारी, प्रवासी व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नसतील तर त्यांची कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारने नव्याने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

याआधी स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी ही केली जात असल्यामुळे 24 तासानंतर या चाचणीचा अहवाल मिळतो. या चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहे. तर दुसरीकडे आता अँटिजन चाचणी केली जात आहे. यात पाचशे रुपयांमध्ये अवघ्या 20 मिनिटांमध्ये रिपोर्ट प्राप्त होत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची लगेच ओळख पटत आहे. त्यामुळे संशयितांना क्वारंटाईन करण्यात येत आहे तर कोरोनाबाधितांना तातडीने कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. पण, तरीही राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

केंद्र सरकारनेही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या कराव्यात असे आदेश दिले होते. त्यानंतर आता राज्य सरकारनेही नवीन मार्गदर्शन सूचना जारी केली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहे अशा लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांची कोरोनाची चाचणी आवश्यक आहे, अशा व्यक्तींचीच अँटिजन चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्ती जर कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात आली किंवा विदेशातून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला असेल किंवा गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले असेल तर दोघांचीही कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. ज्या ठिकाणी सोईसुविधा नाही अशा ठिकाणी अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे.