‘लालपरी’च्या आंतरराज्य सेवेला राज्य सरकारची परवानगी


मुंबई – कोरोनाच्या काळात ठप्प पडलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा आता उद्यापासून सुरु होणार असून त्यासंदर्भातील परवानगी राज्य सरकारने दिली आहे. कारण कोरोनामुळे आजवर निम्मे प्रवासी घेऊन एसटीला वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे खर्च निघनेही कठीण झाले होते. अशी संकटकाळात आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान आहे. त्यातच, एसटीची जिल्हाबाह्य सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. ती मागणी आज अखेर राज्य सरकारने मान्य करत आंतरराज्य एसटी सेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, एसटीची सेवा उद्यापासून ( 20 ऑगस्ट) सुरु होत आहे.

एसटीला पूर्ण लॉकडाऊन काळात दिवसागणिक २२ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन या तत्वानुसार जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली होती. पण तरी देखील क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊनच वाहतूक करावी लागत होती. तास-दीड तासात मिळेल, तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत होती. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन एसटी निघत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. त्यातच, आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यास, राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत एक परिपत्रक जारी केले असून राज्यातील एसटी सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीकडून आणि वाहनांकडून होणारी लुटमार थांबण्यास आळा बसेल. एसटी सेवा गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे, गरिबांच्या हक्काच्या लालपरीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरिखीत झाले आहे. आता, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनचे नियम पाळून लालपरी पुन्हा रस्त्यावर लांब पल्ल्यासाठी धावणार आहे.