सहकारी बँकांबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींना शरद पवारांचे पत्र


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सहकारी बँका कणा आहेत, या माझ्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सहमत असतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर देशात साक्षरता वाढवण्यासाठी देखील सहकारी बँकांनी महत्त्वाची भूमिकाही बजावली असल्याचे पवारांनी पत्रात नमूद केले आहे.

सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल शरद पवार यांनी आपल्या पत्रात चिंता व्यक्त केली. सहकारी बँकांचे सहकारपण कायम ठेवले पाहिजे. असे झाले तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसेच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील, असे शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासगी बँकांमध्ये सहकारी बँकांना बदलणे हे समस्येचे निराकरण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आपण सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याच्याशी सहमत आहोत. पण सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सहकारी बँकांमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा शरद पवार यांनी रिझर्व्ह बँकेची आकडेवारी दाखवत केला आहे. १०० वर्षे जुन्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या सहकारी बँकांवर विनाकारण निर्बंध न घालण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त संबोधित केले होते. त्यांनी यावेळी मध्यमवर्गीयांच्या हितांच्या संरक्षणासाठी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणल्याचे सांगितले होते. सरकारच्या या निर्णयाचे शरद पवार यांनी स्वागत केले, तर सहकारी बँकांना आर्थिक शिस्तीची गरज असल्याचेही म्हटले. परंतु सरकारी बँकांच्या कामकाजावर रिझर्व्ह बँकेचा प्रभाव वाढत असल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली.