सुशांतच्या ‘सर्वोच्च’ निकालावर संजय राऊत म्हणाले…


मुंबई – अनेक माध्यमातून सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरत असतानाच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी झाली. त्यानुसार, सीबीआयने या घटनेचा तपास करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्याचबरोबर सीबीआयला मुंबई पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य करावे, अशा सूचना देखील न्यायालयाने केल्या आहेत. त्यानंतर यावरुन आता राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया आली असून राजकीय प्रतिक्रिया न्यायालयाच्या निकालावर देणे योग्य नाही, कायदेशीर बाब आहे, हे प्रकरण न्यायालयाच्या अख्यारित आहे. न्यायालयाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महाधिवक्ता बोलू शकतात, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत याबाबत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचे राज्य असून ते एक न्याय आणि संघर्ष करणारे राज्य आहे. कधी कोणावर राज्याने अन्याय केला नाही. संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे करणे हे एक षडयंत्र आहे. अत्यंत प्रामाणिकपणे मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास केला आहे. जगभरात मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा आहे. आपल्याच राज्यातील नेते मुंबई पोलिसांची बदनामी करत असतील तर ते राज्याचे खच्चीकरण असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राजकीय वक्तव्य करणे योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधक राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत, त्यावर ते बोलण्यास सक्षम आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकावर शंका घेणे म्हणजे ज्या राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हे जर सगळे ठरवून होत असेल तर त्याला राज्य सरकार काय करणार, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश