जिमनंतर आता मंदिरांसाठी राज ठाकरे आग्रही, पण…


मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन लागू असल्यामुळे राज्यातील मंदिरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. अद्यापही राज्य सरकारने मंदिरे सुरु करण्याबाबत निर्णय न घेतल्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ आले होते. या पुजाऱ्यांनी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीत पुजाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे राज्यातील मंदिरे सुरु करावीत अशी मागणी केली. राज ठाकरेंनी यावेळी कशाप्रकारे तुम्ही मंदिरे सुरु करणार, याची नियमावली आखा. मंदिरात झुंबड झाली तर काय करणार? याची नियमावली तयार करा, राज्य सरकारकडे ही नियमावली सुपूर्द करु अशी सूचना राज यांनी पुजाऱ्यांना केली. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे. पण इतर धर्मियांचे काय? ते सर्व नियम पाळतील का? अशी शंकाही राज यांनी बैठकीत उपस्थित केली.

त्याचबरोबर राज्यातील मॉल उघडले असतील, तर मंदिरे का उघडली नाही? असा सवालही राज ठाकरेंनी राज्य सरकारला केला आहे. जर त्यासंदर्भात नियमावली आली तर ती सर्वांसाठी असेल. मंदिरे उघडलीच पाहिजेत अशी मनसेची भूमिका आहे. पण लोकांची झुंबड आली तर ती कशी नियंत्रणात आणणार? हा प्रश्न आहे. मंदिरे खुली झाली आणि गर्दी झाली तर नियोजन कसे करणार? धार्मिक स्थळे उघडली तर ती फक्त मंदिरासाठी नसेल तर इतर धार्मिक स्थळांसाठीही असेल. आपण नियम पाळले पण इतरांनी नाही पाळले तर काय करणार? राज्य सरकारने याबाबत नियमावली तयार करायला हवी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली.

दरम्यान, मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. कारण, त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच, लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळे याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत म्हटले होते.