आजोबांचा सल्ला पार्थ पवारांनी आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल


मुंबई : शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून पार्थ पवार यांना शरद पवारांचे बोलणे हे ‘आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद’ यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल, असे म्हणत सल्ला देण्यात आला आहे. राजकारणात पार्थ पवार हे नवीन आहेत. त्यांची लोकसभेची उंच उडी चुकली आहे. थोडी जास्त मेहनत त्यांना घ्यावी लागेल. राजकीय व्यायामशाळा त्यांच्या घरातच असल्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी त्यांच्याकडे असल्याचेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

शरद पवार यांची बाजू घेत शिवसेनेने म्हटले आहे की, पक्षाची धुरा सांभाळणाऱ्यांना असे अनेकदा ‘कटू’ बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी देखील असे कडू घोट अनेकदा स्वकीयांना पाजले आहेत. त्यांनी जाहीरपणे त्यांचे कान उपटले आहेत. राजीव गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे आणि ती प्रकृतीला बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार काही वेगळे वागले नसल्याचे म्हटले आहे.

सुशांत सिंह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणे हा मूर्खपणा असला तरी महाराष्ट्रातील अनेक अनुभवी, जुनेजाणते लोकही सीबीआयची ‘री’ ओढत आहेत. पडद्यामागून सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. लहान वयाच्या पार्थ पवारांचा त्याकरिता कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव असल्याचे देखील म्हटले आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वगैरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व, असे देखील म्हटले आहे.

संपूर्ण पवार कुटुंब हे राजकारणातील तालेवार असून अजित पवारांपर्यंत हा तालेवारपणा पोहोचला, पण माणसाची जीभ नियंत्रणात नसेल तर मोठा फटका बसतो. असे फटके राजकीय प्रवासात अजित पवार यांनी अनेकदा खाल्ले असल्यामुळे अजित पवार सावध झाले. सध्या अजितदादांचा त्यांच्या जिभेवर संयम आहे. सध्या मी तोलून मापून बोलतो, असे अनेकवेला अजित पवार जाहीरपणे सांगत असतात; पण पार्थ हे नवखे असल्याने जरा वेगात बोलतात. त्याचे पडसादही उमटतात. अर्थात छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे चि. पार्थ हे ‘नवे’ आहेत. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यातून वाद निर्माण होतात. शरद पवार यांनी या वादावर पाणीच ओतले, असे सामनात म्हटले आहे.

मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यात सक्षम असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केलेच आहे व आता शरद पवार यांनीही मुंबई पोलिसांवरच विश्वास व्यक्त केला. राजपूत प्रकरणी सीबीआय वगैरे ठीक आहे हो, पण मुंबई पोलिसांचे काय चुकले ते सांगा. पार्थ पवार यांनी थेट सीबीआयची मागणी करावी हा प्रकार अनेकांना खटकल्यामुळे पवार कुटुंबातील धाकल्या पातीस ब्रेक लावण्याचे काम झाले, यात ऐवढे हवालदिल होण्याचे कारण काय? शरद पवारांनी एकप्रकारे पार्थ पवार यांना मार्गदर्शनच केले आहे. पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. ते जिंकू शकले नाहीत. एका जयपराजयाने कुणालाही शिखर गाठता येत नाही वा कायमची घसरणही होत नाही, असे या लेखात म्हटले आहे.

शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, त्यांनी जमिनीवरचे राजकारण केले. तेच अजित पवार, सुप्रिया सुळेही करीत आहेत. पवारांच्या तिसऱ्या पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत. पार्थ पवार यांनी राममंदिराचे स्वागत केले यात काहीच चुकीचे नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मर्जीने राममंदिर होत आहे, अयोध्येत राममंदिर होणे ही लोकभावना आहेच. त्या लोकभावनेच्या प्रवाहात सामील व्हायचा अधिकार प्रत्येकाचा आहे. पार्थ पवार यांचाही आहे. पण ते ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाचे वेगळे मत असेल तर मतभिन्नतेचे स्फोट घडतात. स्वतः राहुल, प्रियंका गांधी हे त्या प्रवाहात सामील झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारी केली, तेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँगेसने कसलीच खळखळ केली नव्हती. किंबहुना ज्या श्रद्धेने आपण सगळे पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेतो त्याच श्रद्धेने उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत, टीका कसली करता? असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते. फक्त पार्थप्रमाणे लांबलचक पत्र लिहून मत मांडले नव्हते, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.