अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर भाजपमध्ये गेलेल्यांची राष्ट्रवादीत वापसी करण्याची जबाबदारी


मुंबई : राज्यातील विद्यमान शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार पडण्याचे नवे नवे मुहूर्त भाजप नेत्यांकडून सांगितले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आता घरवापसी अभियान राबवणार आहे. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यात सत्ताधारी काँग्रेसचे आमदार फोडले तर निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आणि पस्तावलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी पक्षात परत घेणार आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाची कामे करण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचे म्हटले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर त्या नेत्यांना घरवापसी करायची आहे. अशा लोकांना परत आणण्याची जबाबदारी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर शरद पवार यांनी सोपवली आहे.

यावर शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवस आधीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर ही बैठक झाली. महाविकास आघाडी सरकार असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचे राजकारण, पक्षाची ताकद पाहून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारले असता भाजपमध्ये गेलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात परत यायचे आहे, ते संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण विद्यमान आमदारांना पक्षात घेणार का हा प्रश्न विचारला असता ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि जे आमदार होऊ शकले नाहीत असे लोक संपर्क करत आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले. ते आमदार नसल्यामुळे त्यांना पक्षात परत घेण्यात महाविकास आघाडीतील इतर पक्षांना पण अडचणी नसतील, असेही ते म्हणाले. मंत्री भुजबळ यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात दुसऱ्या पक्षातील कुणी आमदार परत येणार असतील तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले. पण सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र असल्याने परत निवडून येण्यात काही अडचण येणार नाही, असेही स्पष्ट केले.

एकीकडे महाराष्ट्रात सरकार पडणार असा दावा भाजप नेते करत असताना तसेच राजकीय वर्तुळात ऑपरेशन लोटसच्या चर्चा होत असताना, भाजपला मेसेज देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस घरवापसी मिशन राबवणार आहे. राजस्थानमध्ये भाजपचे सत्ता स्थापनेचे प्रयोग अयशस्वी झाल्यावर महाराष्ट्रात तिन्हीही पक्ष सतर्क आहेत.