गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा टोल माफ


मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्यातील ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाणाऱ्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी दिली.

यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी टोल सवलतीसाठी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. नागरिकांनी त्यासाठी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.