सुशांत सिंह प्रकरणावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच केले भाष्य


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर भाष्य केले आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी असून अशी घटना घडायला नको होती, पण माध्यमातून ज्या पद्धतीने चर्चा होत आहे, त्याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

एखाद्या अभिनेत्याची आत्महत्या ही घटना खूपच दुर्दैवी आहे. पण ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये चर्चा होत आहे त्याचे आश्चर्य वाटते. २० शेतकऱ्यांनी माझ्या जिल्ह्यात आत्महत्या केली. पण माध्यमे त्याची नोंदही घेत नसल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर महाराष्ट्र तसेच मुंबई पोलीस सक्षम आहेत. मला त्यांच्यावर १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे वाटत असेल, तर त्याला मी विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सीबीआय चौकशीची पार्थ पवार यांनी मागणी करण्यासंदर्भात त्यांना विचारले असता, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असे विचारण्यात आले असता यामागे नेमका काय हेतू आहे, हे मी देखील सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले.