राज्य सरकारने केली आदित्य ठाकरेंची पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती


मुंबई – राज्य सरकारने केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरवर्षी हे पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा केंद्र सरकारतर्फे गौरव केला जातो. या समितीच्या माध्यमातून याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम केले जाते. आदित्य ठाकरेंना यंदा या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.

राजेश क्षीरसागर यांनी, पद्म पुरस्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब, असं ट्विट करत या नियुक्तीबद्दल आदित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विटवरुन या समितीमध्ये निवड झालेल्यांचे अभिनंदन केले आहे.

पद्म पुरस्कार समितीचे आदित्य ठाकरे हे अध्यक्ष असून या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.