मुंबई – पुन्हा एकदा राज्य सरकारवर भाजप खासदार नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीत एकमत आणि ताळमेळ नाही. तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या असल्यामुळे सरकार स्थिरपणे चालत असल्याचे दिसत नसल्यामुळे हे सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत राहील असा पुनरुच्चार राणेंनी केला आहे.
याबाबत नारायण राणे म्हणाले की, सध्या सरकार स्थिरपणे चालत नाही, त्यांचे आपआपासातच वाद आहेत, महाविकास आघाडीत ना एकमत आहे, ताळमेळ आहे. त्यामुळे सरकार चालणार कसे? हे सरकार जेमतेम सप्टेंबरपर्यंत चालू शकेल असा दावा त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच नारायण राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर सुशांत सिंग प्रकरण आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद यावरुन निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना खूप काम आहे, आम्ही मोकळे आहोत, कधी कर्नाटकात येताय, मी येतो असे संजय राऊतांना त्यांनी आव्हान दिले आहे. मी संजय राऊतांना नेता मानत नाही, मी जाईन त्यांनी यावे, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. शिवसैनिक सुशांत सिंग प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी आंदोलन करत आहे, हा वाद लोकांचे लक्ष मुख्य विषयाकडून वळवण्यासाठी पेटवला जात आहे. पण सुशांतचा खून की आत्महत्या याचा तपास सुरु असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे.