स्वातंत्र्य दिनासंदर्भात राज्य सरकारची नियमावली


मुंबई – यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमालाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनची नियमावली बंधनकारक असणार आहे. हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था वा व्यक्तीच्या पुढाकाराने कमी माणसांतच घेण्यास परवानगी देण्यात आली. यासंदर्भात परिपत्रक काढून यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाबद्दल राज्य सरकारने माहिती दिली आहे. यंदा आपण देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असून हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यावर यंदा मर्यादा आहेत. हे निर्देश वस्तुस्थिती व सावधगिरीचा उपाय म्हणून देण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.र

यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढून काही सूचना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने केल्या आहेत. मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर, पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडेल. पालकमंत्र्याच्या हस्ते राज्यातील इतर जिल्ह्यात व विभागीय क्षेत्रात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. ध्वजारोहण सोहळा राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच, यंदाच्या ध्वजारोहण सोहळ्याला शहीद जवानांच्या पत्नी, आई-वडिल, कोरोना योद्धा आणि कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना आमंत्रित करावे, असेही सूचविण्यात आले आहे.

कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग, लॉकडाऊनची नियमावली पाळून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत या घोषणेचा प्रसार करावा, असेही सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडियातून नागरिकांनी ध्वजारोहण सोहळा साजरा करताना देशभक्तीपर गीते, वेबिनार यांचे आयोजन करावे. त्यासोबतच, घरातील बाल्कनीत आणि गच्चीवर जाऊन हाती तिरंगा फडकवावा, असेही आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.