बेळगाव – छत्रपती शिवाजी महाराजांचा बेळगावमधील मणगुत्ती गावातील पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. या घटनेचे पडसाद राज्यातील अनेक जिल्ह्यात उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत पुन्हा बसवून देण्याचे आश्वासन दिले आहे. मणगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर याचे पडसाद दिसून आले.
कर्नाटक सरकारचे आश्वासन; आठ दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात जागोजागी उमटले आहेत. भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, महाराजांचा पुतळा आठ दिवसात बसवला नाही, तर गावकरी नवव्या दिवशी पुतळा बसवणार, असा निर्णय पोलिस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.