उद्यापासून मुंबईतील दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडणार


मुंबई : उद्यापासून म्हणजे 5 ऑगस्टपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. तत्पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू होती. आता मुंबईतील सर्व दुकाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खुली करण्याची परवानगी देण्यात आली असून यासंदर्भातील परिपत्रक बृह्नमुंबई महानगरपालिकेने काढले आहे.

विशेष यात मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे. त्याचबरोबर मद्याची होम डिलिव्हरीची सुविधा देखील देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधील दुकानेही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांच्या पार गेला आहे. त्याचबरोबर मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.