३१ ऑगस्टपर्यंत वाढला राज्यातील लॉकडाऊन; अशी असेल नियमावली


मुंबई : कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आल्यानंतर केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातही लॉकडाउन कायम असणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउन वाढवण्याच्या घोषणेसोबतच ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना आदेशात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यावेळी नियमांचे कठोरपणे पालन करण्याची सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

जुन्या मार्गदर्शकतत्वांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेले नाहीत. पण महत्त्वाचे म्हणजे ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपले किचन सुरु ठेऊ शकतात.

त्याचबरोबर आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखांब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. पण यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.

अत्यावश्यक सेवेची दुकाने ज्यांना याआधीही परवानगी होती, ती सुरु राहतील तसेच अनावश्यक सेवेची दुकाने ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ती सुरु राहतील. अत्यावश्यक तसेच अनावश्यक मार्केट परिसर आणि दुकानांना सकाळी ९ चे संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसेच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व इंडस्ट्रियल युनिट्सना काम सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.