जाणून घ्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे होणारे बदल


नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून या धोरणा अंतर्गत देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. शिक्षणाचा अधिकार (RTE- Right to Education) या कायद्याची व्याप्ती नव्या शैक्षणिक धोरणानुसार वाढवण्यात आली आहे. तर दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्वही कमी केले जाणार आहे. विशेष म्हणजे इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाईल.

नव्या धोरणाच्या मसुद्यात मुलांच्या वयाऐवजी विकासाच्या टप्प्यांवर आधारित 5 + 3 + 3 + 4 असा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक रचना

  1. वय 3-8 वर्षे : पूर्व प्राथमिक तीन वर्षे आणि इयत्ता पहिली-दुसरी
  2. वय 8-11 वर्षे : प्राथमिक शिक्षण – इयत्ता तिसरी ते पाचवी
  3. वय 11-14 वर्षे : पूर्व माध्यमिक शिक्षण – इयत्ता सहावी ते आठवी
  4. वय 14-18 वर्षे : माध्यमिक शिक्षण – इयत्ता नववी ते बारावी

नव्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचे मुद्दे

  • अंडर ग्रॅज्युएट महाविद्यालये अधिक स्वायत्त असतील
  • दहावी आणि बारावीच्या मार्कशीटमध्ये ‘कौशल्य’ आणि ‘क्षमता’ विभाग असेल;
  • विद्यार्थी एकत्रितपणे दोन शाखांचा अभ्यास करु शकतात
  • 5 + 3 + 3 + 4 मॉडेलनुसार शाळेसाठी 12 वर्षे
  • उच्च शिक्षण अभ्यासक्रमात विषयांसाठी अधिक लवचिकता
  • वंचित प्रदेशासाठी ‘सेझ’ (विशेष आर्थिक क्षेत्र)
  • आठवीपर्यंत प्रादेशिक भाषा अनिवार्य
  • उच्च शिक्षणासाठी एकल नियामक (सिंगल रेग्युलेटर)
  • पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत

प्रादेशिक भाषांमध्येही ई-कोर्सेस विकसित केले जातील, त्याचबरोबर व्हर्चुअल लॅबही विकसित केल्या जाणार आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (एनईटीएफ) तयार केले जात आहेत, असे बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. याआधी 1986 मध्ये तयार केलेले शैक्षणिक धोरण 1992 मध्ये सुधारण्यात आले होते. आता त्याची जागा ‘शैक्षणिक धोरण 2019’ घेणार आहे.

आता शिक्षणाचा अधिकार या कायद्याच्या कक्षेत तीन वर्षे वयोगटापासून 18 वर्षांपर्यंतची मुले येतील. सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि 2025 पर्यंत सर्वांना मूलभूत साक्षरता प्रदान करणे, हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात काय काय?

  • कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर संबोधले जाणार नाही
  • नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिक अभ्यासाची तरतूद आहे. दोन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये भाषा पटकन शिकण्याची क्षमता असते. बहुभाषिकत्वाचे फायदे असल्याने मुले या वयात तीन भाषा शिकतील. भारताच्या अभिजात भाषांवरही लक्ष केंद्रित केले जाईल.
  • या धोरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण, कायदा शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणही याच कक्षेत आणले गेले आहेत.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल (फ्रेंडली) शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे.
  • ‘राष्ट्रीय शिक्षण आयोगा’ची स्थापना करण्याची आणि खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारसदेखील नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये

  • आता दहावी-बारावी बोर्ड परीक्षा नसणार
  • 10 +2 ऐवजी 5 +3 +3+ 4 पॅटर्न
  • आता सेमिस्टर पॅटर्नवर असणार भर
  • सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षण समान
  • शालेय अभ्यासक्रमही आता बदलणार
  • एका वर्षात 2-3 वेळा परीक्षांची संधी
  • सर्व विद्यापीठांसाठी समान नियम
  • एमफीलची परीक्षा आता रद्द