निमंत्रण मिळाले तरी राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार नाही… कारण


मुंबई – राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्यावरुन भिन्न मते आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत एक वक्तव्य केले होते. शरद पवारांनी त्यावेळी सध्या आम्ही राम मंदिराच्या भूमिपुजनाचा नव्हे, तर कोरोनाविरुद्ध कसे लढता येईल, याचा विचार करत आहोत. पण काही लोकांना मंदिराचे निर्माण केल्यामुळे कोरोना जाईल असे काही लोकांना वाटत आहे. त्यामागे त्यांचे काही कारण असू शकते. पण सध्याच्या घडीला कोरोनावर लक्ष द्यायला हवे असे म्हटले होते. पण त्यांच्या विधानावरुन अनेक वाद झाले.

शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही थेट उत्तर देणे टाळले होते, उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत आपले मत मांडताना म्हणाले होते की, नुसते हो किंवा नाही असे उत्तर द्यायचे तर मी व्यक्ती म्हणून काहीही उत्तर देऊ शकेन. शिवसेनेच्या राम मंदिराच्या लढ्यातील भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री नसतानाही मी अयोध्येला गेलो होतो. माझी योगायोगावर श्रद्धा आहे. मी पहिल्यांदा २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये राम मंदिरात गेलो होतो. त्यावेळी शिवनेरीवरील माती मी घेऊन गेलो होतो. त्यामुळे या विषयाला चालना मिळाली. हा विषय थंड पडला होता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा पण राम मंदिर बनवा, अशी आमची भूमिका होती. मी २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये तिथे गेलो आणि २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये हा प्रश्न सुटला, ही माझी श्रद्धा आहे. कुणाला अंधश्रद्धा म्हणायचे असे तर खुशाल म्हणावे, असे ही ते पुढे म्हणाले.

कोरोनाने सध्या सर्वत्र थैमान घातलेले आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हाही मला मानपान मिळाला. तेही शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून. माझ्याकडे ती पुण्याई आहेच. आता तर मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल. मी व्यवस्थित जाईन. मी पूजाआर्चा करून किंवा कार्यक्रमात सहभाग होऊन परत येईन. पण हे मंदिर सर्वसामान्य मंदिर नाही. एखाद्या गावातील मंदिर बांधायचे म्हटले तर गावकरी एकदिलाने एकत्र येतात. त्या गावासाठी ते अयोध्येसारखेच राममंदिर असते. अयोध्येला ते अनेक लोक जाऊ शकत नाहीत. लाखो रामभक्त जे अयोध्येत उपस्थित राहू इच्छितात त्यांचे काय करणार, त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का, कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार, नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी आता यावर स्पष्टीकरण दिले असून कोणताही वाद राम मंदिराबाबत नाही, हा वाद सर्वोच्च न्यायालयाने मिटवलेला आहे, राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, पण निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही, कारण राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी असल्याचे सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. ते बोलत होते.