इसिस बनत आहे भारतासाठी धोकादायक; संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा


नवी दिल्ली – भारतासाठी संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. इसिस ही दहशतवादी संघटना भारतासाठी धोकादायक बनण्याची चिन्हे दिसत असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार भारतात इसिसचे १८०-२०० सदस्य सक्रीय असून केरळ आणि कर्नाटकसारख्या राज्यात हे सदस्य पसरले आहेत. त्याचसोबत भारतात विलायह ऑफ हिंद प्रांत बनवण्याची घोषणा इसिसने केली आहे.

याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीने रिपोर्ट दाखवला असून संयुक्त राष्ट्राच्या या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, इसिस कोविड १९ नावाखाली भारतातील लोकांकडून पैसे मागत आहेत, त्यांचा प्रोपेगेंडा लोकांमध्ये पसरवत आहे. इसिसचा प्रोपेगेंडा पसरवण्याचा प्रयत्न एका मॅगजीनच्या सहाय्याने लॉकडाऊन दरम्यान सुरु आहे. यात भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव करण्यासाठी मुस्लीम समुदायाच्या लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. कोरोना महामारी संधी असून या माध्यमातून जिहाद पसरवण्याचे सांगितले जात आहे.

या दिशेने भारतीय तपास यंत्रणा चौकशी करत असून त्यांना यशही मिळाले आहे. केरळ आणि कर्नाटकातून काही संशयित लोकांवर त्यांनी कारवाई केली आहे. हे सर्व लोक टेलीग्रामच्या माध्यमातून त्यांचे संघटन चालवत होते. त्यासोबत फेसबुकवर फेक नावाने सक्रीय होते. सध्या स्पेशल सेल आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्था खुरासान मॉड्यूलची पडताळणी करत आहेत. जे मॅगजीनद्वारे प्रोपेगेंडा पसरवत आहेत.

या प्रकरणात ५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. हिना बशीर बेग, जहानजेब, अब्दुल बाशित, सादिया अनवर शेख आणि नबेल यांचा यात समावेश आहे. सीएए आणि नागरिकत्वा सुधारणा कायद्याच्या नावाखाली हे सर्व युवकांना भडकावत होते, दिल्लीत लोन वुल्फ अटक प्लॅनिंगदेखील करत होते. त्यासोबत दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्फोटकांची मागणी करत होते.

पहिल्यांदाच भारतात प्रांत स्थापन करण्यात इस्लामिक स्टेट (इसिस) यशस्वी झाले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार हा दावा काश्मीरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीनंतर करण्यात आला आहे. विलायह ऑफ हिंद असे या प्रांतचे नाव ठेवण्यात आले आहे. एप्रिलमध्ये इराक आणि सिरीयातून आयएसच्या वर्चस्वाला धक्का पोहचल्यानंतर त्यांनी आत्मघातकी हल्ल्याचे प्रमाण वाढवले आहे. श्रीलंकेत काही महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले होते, यात २५३ लोकांचा मृत्यू झाला होता.