मुख्यमंत्र्यांनी दिले १ ऑगस्टपासून लॉकडाउन शिथील करण्याचे संकेत


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन ३१ जुलै रोजी संपत असून त्यानंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जातील असे संकेत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

लॉकडाउन हा शब्द मी वापरत नाही आहे. याला मी अनलॉकडाउन असे म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आपण आहोत. याशिवाय ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार ३१ जुलैनंतरचे धोरण ठरवण्यासाठी केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. निर्बंध शिथील होतील तसेच निर्णय घेण्याची राज्यांना मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना केंद्राच्या सूचनांवरच अवलंबून असतील. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, जीम, रेस्तराँ आणि स्विमिंग पूल सुरु करण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देईल असे वाटत नाही. तसेच शहर आणि ग्रामीण भागात बसेसनाही परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. शेवटी हा सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोना नियंत्रणासाठी कृती गट प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासोबतच प्रत्येक गावात कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.