केंद्र सरकारची पालकांना विचारणा; शाळा कधी सुरु करायच्या ते सांगा


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसून त्यातच देशातील अनेक राज्य लागू असलेला लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात आहेत. याच दरम्यान देशभरातील शाळा बंद असून सध्या ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता अद्यापही पालकांना सतावत आहे. यादरम्यान मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले असून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी पालकांकडून मत मागवण्यास सांगितले आहे. नेमक्या कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणे, तुम्हाला योग्य वाटते अशी पालकांकडे विचारणा करण्यास सांगण्यात आले आहे.

तीन दिवसांची डेडलाइन राज्यांना अभिप्राय नोंदवण्यासाठी देण्यात आली आहे. सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांना १७ जुलै रोजी पाठवण्यात आलेल्या पत्रात मंत्रालयाकडून विनंती करण्यात आली आहे की, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २० तारखेपर्यंत अभिप्राय नोंदवला जावा. पालकांचे दोन प्रश्नांवर मंत्रालयाकडून मत मागवण्यात आले आहे. यामधील पहिला प्रश्न म्हणजे, ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणे पालकांना अनुकूल वाटते. दुसरे म्हणजे पालकांच्या शाळा सुरु झाल्यानंतर काय अपेक्षा असणार आहेत.

एकीकडे राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्याने दुजोरा दिला असताना दुसरीकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने जाहीर केलेली नाही. सोमवारची डेडलाइन अभिप्राय देण्यासाठी असताना अद्यापही अनेक शाळांना याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचे कळत आहे. दिल्लीमधील केंद्रीय विद्यालयातील मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही मेल आम्हाला पालकांकडून अभिप्राय घेऊन नोंदवण्यासंबंधी मिळालेला नाही. पण दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांची पालक अद्यापही शाळा सुरु करण्याविरोधात असल्यावरुन बैठक झाली. २९ जून रोजी गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक-२ च्या गाइडलाइन्स नुसार शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.