रायगड – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी, महाराष्ट्राची अस्मिता, अनेक शिवप्रेमींसाठी श्रद्धा स्थान असलेल्या रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव तब्बल दिडशे वर्षानंतर तुडुंब भरल्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. छत्रपती संभाजीराजेंना देखील भरलेला हत्ती तलाव बघण्याचा मोह आवरता न आल्यामुळे शनिवारी खासदार संभाजीराजे यांनी रायगडचा दौरा केला. दरम्यान संभाजीराजे हे रायगड किल्लाच्या संवर्धनाची जबाबदारी घेतल्यापासून तेथील कामांचा आढावा घेण्यासाठी गडावर नेहमी जातच असतात. पण कोरोनाच्या या संकटकाळात काही शक्य झाले नाही, अखेर हत्ती तलाव भरल्यानंतर त्यांनी गडावर जाऊन नयनरम्य दृष्याचा आनंद घेतला.
खासदार संभाजीराजेंनी याबाबत फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्यात भर पावसात रायगड पाहण्याचा आनंद वेगळाच! काठोकाठ भरलेल्या हत्ती तलावातील पाण्याचे पुजन यावेळी करण्यात आले. गडावरची निर्गुडीची पाने, रान फुले वाहून अगदी साधेपणाने परंतु मनोभावे जलपूजन केले. रायगड विकास प्राधिकरणाला मिळालेले हे यश अभूतपूर्व आहेच पण, गडावरील वास्तूंच्या इतिहासात प्राधिकरणाचे अमुल्य योगदान सुद्धा असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच प्राधिकरणाच्या संबंधित सर्व सदस्य, तज्ञ, अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी अहोरात्र केलेल्या कष्टाचे आणि सर्व शिवभक्तांच्या पाठिंब्याचे हे फलित आहे. हत्ती तलावात भरलेले निळेशुभ्र पाणी पाहून ते पिण्याचा मोह मी रोखू शकलो नाही. या तलावातील पाणी कदाचित शिवछत्रपती, संभाजी महाराज, राजाराम महाराजांनी सुद्धा पिले असेल, असा विचार मनात क्षणभर तरळून गेला. त्याकाळी असंख्य मावळ्यांची तहान या तलावाच्या भागवली असेल अशी भावना संभाजीराजेंनी व्यक्त केली.
दरम्यान, तलावाला अजूनही एक-दोन ठिकाणी गळती आहे, येत्या काही दिवसात त्याच काम करण्यात येईल. या तलावाची गळती काढण्यासाठी यापूर्वीही पाच ते सहा वेळा प्रशासनाकडून प्रयत्न झाले होते, असे म्हणतात. पण, कुणालाही यश मिळाले नव्हते. यावेळेस आपण यशस्वी झालो असा विश्वास खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला.