बॅन केलेल्या ५९ चिनी अ‍ॅप्सना सरकारने पाठवली ७० प्रश्नांची यादी


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारकडून ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणल्यानंतर या अ‍ॅप्सना काही प्रश्नांची यादी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. सरकारकडून त्यांना येत्या तीन आठवड्यांमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास ७० प्रश्नांची यादी या अ‍ॅप्सना माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून पाठवण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार जवळपास ७० प्रश्नांची यादी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून पाठवण्यात आली आहे. ही प्रश्नांची यादी टीक-टॉक, हेलो आणि शाओमी यांसारख्या कंपन्यांना पाठवण्यात आली असून त्यावर तीन आठवड्यात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. डेटा मॅनेजमेंटसारख्या विविध प्रश्नांची विचारणा त्यात करण्यात आली आहे.

जवळपास ७० प्रश्नांच्या यादीमध्ये कमकुवत सिक्युरिटी आणि अनधिकृत डेटा अ‍ॅक्सेसबाबतही उत्तर देण्यास सांगितलं आहे. विविध कंपन्यांकडून त्यांची रचना, डेटा संकलन प्रक्रिया याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या अ‍ॅप्सकडून बंदी घातल्यामुळे सरकारसमोर आपली बाजू मांडण्याची मागणी केली जात असताना, त्यांना सरकारने आता ७० प्रश्नांची विचारणा केली आहे.

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठली अ‍ॅप्स धोकादायक आहेत, कुठली धोकादायक नाहीत अशा बाबींबरोबरच भारतीय ग्राहकांचे व देशाचे हितसंबंध जपण्यात येत आहेत की नाही याची माहिती या प्रश्नांच्या उत्तरांमधून मिळणे सरकारला अपेक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment