सारथीसंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा; बंद होणार नाही सारथी, देणार आठ कोटींचा निधी


मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने आज राज्यात चर्चेच्या केंद्रस्थळी मागील काही दिवसांपासून असलेल्या सारथी संदर्भात मोठा निर्णय घेतला. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार असून त्याचबरोबर सारथीला उद्याच आठ कोटींचा निधी दिला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांना सारथी संस्थेसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत तिसऱ्या रांगेत बसवण्यात आल्याने गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. सारथीवरुन वाद निर्माण होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. छत्रपती संभाजीराजे यांनाही या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. छत्रपती संभाजीराजे बैठकीत तिसऱ्या रांगेत बसल्याचे पाहून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनाही नाराजी दर्शवत गोंधळ घातल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

सारथीची बैठक मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बोलावण्यात आली होती. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे बैठकीत तिसऱ्या रांगेत बसलेले पाहून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनाही गोंधळ घालत त्यांना व्यासपीठावर बसवण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. संभाजीराजे यांना मंचावर बसण्याची सर्वांनी विनंती केली. पण सामंजस्याची भूमिका घेत आपण सारथी संस्थेसंबंधी तोडगा काढण्यासाठी आलो असल्याचे सांगत छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. आपणही एक सदस्य म्हणून खालीच बसू अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रकरण शांत झाले आणि बैठकीला सुरुवात झाली.

Leave a Comment