राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 11 हजार 987च्या पार


मुंबई : राज्यात काल दिवसभरात 5 हजार 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2 लाख 11 हजार 987 एवढा झाला आहे. तर काल दिवसभरात 3 हजार 522 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 15 हजार 262 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 87 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात काल 204 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 35 हजार 447 नमुन्यांपैकी 2 लाख 11 हजार 987 (18.67 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 265 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 46 हजार 355 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 3 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.37 टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 262 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात काल 204 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे.

कोरोनाबाधितांची मुंबई शहरातील वाढणारी संख्या जास्त चिंता वाढवणारी आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईने चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये 85 हजार 320 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 85 हजार 724 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Comment