महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई – राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील रोजगारात भूमिपुत्रांना ८० टक्के संधी मिळावी यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकार Maha Jobs पोर्टल लॉन्च करणार असून कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचार्‍यांची भरती याच्या माध्यमातून केली जाणार आहे.

या पोर्टलची जबाबदारी एमआयडीसीकडे असेल. एमआयडीसीने स्थानिकांची भरती करण्यासाठी ९५० व्यापार आणि १७ वेगेवगळी क्षेत्र निवडली आहेत. या पोर्टलवर इंडस्ट्री युनिट आणि नोकरीची गरज असणारे दोघेही नोंदणी करु शकतात. यासंदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.

याबाबत उद्योग विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाउनचे निर्बंध शिथील केल्यानंतर राज्यातील ६५ हजार इंडस्ट्रीयल युनिट्स सुरु झाले असून एमआयडीसीकडून त्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक मानव संसाधन सर्वेक्षण करण्यात आले. आम्हाला जवळपास ३३०० युनिट्सकडून प्रतिसाद मिळाला. जवळपास ५० हजार कर्मचाऱ्यांची त्यांना गरज असल्याचा अंदाज आहे. यापैकी ७० टक्के कुशल तर ३० टक्के अकुशल आहेत.

त्याचबरोबर या पोर्टलवर भरतीसाठी एमआयडीसीमध्ये स्थित असणारे इंडस्ट्रीयल युनिट तसेच बाहेर असणारेही नोंदणी करु शकतात. १७ क्षेत्रांची निवड करण्यात आली असून यामध्ये ऑटोमोबाइल, अभियांत्रिकी, उत्पादन, लॉजिस्टिक, वस्त्रोद्योग, वस्त्र, प्रक्रिया, औषधनिर्माण आणि जैव तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

हे पोर्टल एक मंच उपलब्ध करुन देईल. कंपनी तसेच ज्यांना नोकरीची गरज आहे ते दोघेही नोंदणी करु शकतात. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल सर्वांसाठी ही संधी उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करताना कंपन्या ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देतील अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

Leave a Comment