कोरोनिलबाबत जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर करणार कारवाई


मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांच्या पंतजली आयुर्वेद संस्थेने काही दिवसांपूर्वी ‘कोरोनिल’ हे औषध लाँच केले होते. पण या औषधाच्या जाहिरातीवरून आणि विक्रीवरून मोठे वादंग निर्माण झाले होते. त्याचबरोबर पतंजलीला या औषधाची जाहिरात आणि विक्री थांबवण्यास सांगून चाचणीचा अहवालही सादर करण्यास आयुष मंत्रालयानेही सांगितल्यानंतर प्रतिकारशक्तिवर्धक म्हणून या औषधाला आयुष मंत्रालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पतंजलीवर जनतेत संभ्रम निर्माण केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पतंजलीने बाजारात आणलेल्या ‘कोरोनिल’मुळे कोरोना बरा होत नाही. तसेच या औषधामुळे कोरोना बरा होतो, असा संभ्रम जनतेत पतंजलीने निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणा उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

कोरोना या औषधामुळे बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध कोरोनिल हे अश्वगंधा, तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी असून तिचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होतो. या औषधाची आयुष मंत्रालयानेदेखील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात कोरोना यामुळे बरा होत नसल्याचे डॉ. शिंगणे म्हणाले.

औषधासाठी कोरोनिल हे दिलेले नाव आणि प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून कोरोनिलचा वापर केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही, याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहनही शिंगणे यांनी केले आहे.

Leave a Comment