१५ जुलैपासून सुरु होणार अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया


मुंबई – राज्यातील शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली असून १५ जुलैपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. बुधवारपासून प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या महिना अखेरीस दहावीचा निकाल जाहीर करण्याचे राज्यमंडळाने जाहीर केले आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया निकालानंतर पुढील दीड महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन विभागाने केले आहे. शिक्षण विभागाने या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

१५ जुलैपासून प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थी अर्जाचा पहिला भाग भरू शकतील. विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होईपर्यंत अर्जाचा पहिला भाग भरता येईल. विद्यार्थ्यांना या भागात त्यांची माहिती भरावी लागणार आहे तर, विद्यार्थ्यांना भाग २ मध्ये महाविद्यालयाचे पसंतीक्रम द्यायचे आहेत.

दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर दुसरा भाग भरण्याची संधी मिळणार आहे. ही प्रक्रिया यंदा शाळांमधून न होता पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भातील माहिती पुस्तिकाही ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. बुधवारपासून प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांची नोंदणी सुरू झाली असून महाविद्यालयांचा तपशील उपसंचालक कार्यालयातून तपासून घेऊन अंतिम करण्यात येणार आहे.

Leave a Comment