
मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही तुमच्यात मतभेद आहे हे बोलायचे नाही का? त्यामुळे आता चौथीत शिकणारी मुलगी देखील यांचे काही खरे नाही, हे सांगेल. पण जर फडणवीसांकडे कोरोनाकाळात फक्त दोन तास मागितले असते, तर अवघ्या दोन तासांमध्ये किती तरी प्रश्न सोडवले असते. पण आमची मदत घ्यायला यांचा अहंकार आडवा येतो, असे म्हणत ठाकरे सरकारवर चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. चंद्रकांत पाटील यांनी ही टीका एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.
फडणवीस असते तर अवघ्या दोन तासात सोडवले असते प्रश्न – चंद्रकांत पाटील
सध्या राज्यात लॉकडाउन की अनलॉक सुरु आहे हे सुद्धा कळत नाही, त्यातच यांचे मतभेद आणि गोंधळ काही केल्या संपत नाही. या सरकारने लॉकडाउनमध्ये जेवढे कडक निर्बंध नव्हते तेवढे कडक निर्बंध अनलॉकमध्ये घालून ठेवल्यामुळे आता राज्यातील जनतेने नक्की काय करायचे? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
