यापुढे राज्यातील कोविड रुग्णालयात मिळणार नातेवाईकांनाही प्रवेश : राजेश टोपे


मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधित ज्या रुग्णालयात दाखल आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात होता. पण आता यापुढे कोरोना रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश नाकारत येणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. नातेवाईकांसाठी रुग्णालयात एक जागा ठेवावी जिथे रुग्ण आणि नातेवाईकांना बोलता येईल. त्याचबरोबर आयसीयूमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचेही आदेश देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, मुंबईच नव्हे तर राज्यभरातून रुग्णवाहिकांबाबत तक्रारी येत होत्या. अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे सरकारने खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा त्याचा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेतील. त्यापेक्षा जास्त दर घेतला तर त्यांचा परवाना रद्द करण्याबरोबर गुन्हा दाखल केला जाईल. ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर लावला तर लोक जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करू शकतात, असे टोपे म्हटले आहे.

त्याचबरोबर एक समिती महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाईल. ज्या समस्या कोरोनाच्या काळात समोर येत आहेत त्यावर या समिती नजर ठेवणार आहेत. कोरोनासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक हेल्पलाईन असावी त्याची अंमलबजावणी ही समिती करेल. कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था करण्यासाठीही ही समिती लक्ष देईल. जिथे लोक बेशिस्तीने वागत आहेत, त्याठिकाणी स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू लावत असेल तर कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी तसे अधिकार त्यांना देण्यात आल्याचे टोपे म्हणाले.

तसेच काही भागात अनावश्यक गर्दी वाढत असल्यामुळे विनाकारण फिरू नये यासाठी दोन किलोमीटरचा निर्णय घ्यावा लागत आहे. याची नीट कल्पना अनेकांना नसल्यामुळे ते बाहेर पडतात आणि त्यांची वाहने जप्त केली जातात. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले आहे. तरीही लोकांशी जास्त कठोर वागू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.

अनेक ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण गांभीर्याने केले जात नसल्यामुळे काही ठिकाणी बाधितांची संख्या वाढत असल्याचेही ते म्हणाले. प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. 10 पैकी 9 रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरू करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

Leave a Comment