राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिकची वाढ


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. काल राज्यभरात 5318 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात 5024 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. यापैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात एकूण 4 हजार 430 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.94 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल दिवसभरात 167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 86 मृत्यू मागील 48 तासातील आहेत, तर उर्वरित 81 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील 64, जळगाव 5, धुळे 4, अहमदनगर 2, नाशिक 2, वसई विरार 1, पिंपरी चिंचवड 1, जालना 1 आणि लातूर 1 यांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 4.57 टक्के एवढा आहे.

आतापर्यंत राज्यातील 8 लाख 96 हजार 874 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 1 लाख 59 हजार 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण 17.74 टक्के एवढे आहे. सध्या 67 हजार 600 रुग्णांवर राज्यात उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या 5 लाख 65 हजार 161 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये आहेत तर 36 हजार 925 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.

Leave a Comment