कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय


मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून बिगर व्यावसायिक / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अंतिम वर्षाची /अंतिम सेमिस्टर परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही परीक्षा किंवा वर्ग घेण्यास सध्याचे वातावरण अनुकूल नसल्याने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची/अंतिम सेमेस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी ठरवलेल्या सूत्रानुसार पदवी देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील एक पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर यामध्ये त्यांनी एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना पत्र लिहून एमडी/एमएस या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर डिसेंबर २०२० पर्यंत ही परीक्षा तहकूब करण्याची विनंतीही राज्य सरकारने मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाला (आयसीएमआर) केली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सध्या वाढ होत आहे. त्याचबरोबर सर्व सरकारी डॉक्टरही रुग्णांच्या सेवेत दिवसरात्र झटत आहेत. या सर्व परिस्थितीत, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमडी/एमएसच्या परीक्षांचे ३० जुलैपूर्वी आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment