मुंबई – 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या. भाजप-शिवसेनेने ही निवडणूक एकत्र लढवली होती. पण मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवारांसोबत हात मिळवणी करून राज्यात नवे सरकार स्थापन केले होते. पण अवघ्या दोनच दिवसात ते सरकार कोसळल्यामुले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण घडामोडीनंतर फडणवीस यांना त्या धक्क्यातून सावरायला दोन दिवसांचा कालावधी लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगतिले आहे.
देवेंद्र फडणवीस या विशेष मुलाखतीत म्हणाले की, मला केंद्रीय नेतृत्वाने तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात अशी कल्पना दिली होती. केंद्रीय नेतृत्व मला सारखे तुम्हाला लीड करायचे आहे, असे सांगत असल्यामुळे मला कल्पना आली होती की, मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. पण ते आमच्या पद्धतीनुसार कुणाला कळू द्यायचे नव्हते. कुटुंबियांनादेखील यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अगदी या कानाची दुसऱ्या कानाला देखील खबर पोहचवायची नसल्यामुळे बाहेर कुणालाही मी काहीही बोललो नाही. त्यामुळे माझा आनंदही बाहेर दिसला नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Priemere of my interview with Raju Parulekar @rajuparulekar https://t.co/ODyNiRexeo
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 23, 2020
तसेच ज्यावेळी कुणाला वाटले नव्हते की मी मुख्यमंत्री होईल. त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो. अन् जेव्हा माझ्यासहित सगळ्यांना माहिती होते की, मुख्यमंत्री मीच होणार आहे त्यावेळी झालो नाही. पण त्याचे दु:ख निश्चित झाले. हे सगळे विश्वास ठेवण्याजोगे नव्हते. मी आता मुख्यमंत्री नाही, यावर विश्वास बसायला दोन दिवसांचा कालावधी लागल्याचे त्यांनी म्हटले.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षानी एकत्र येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून त्यांच्या कामगिरीची संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूकही होत आहे.