ठाकरे सरकारवर फडणवीसांचा गंभीर आरोप; लपविली मुंबईतील मृतांची आकडेवारी


मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता का लपविण्यात आले? आणि याबाबत एवढे मोठे दुर्लक्ष का झाले? असे प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर यावर सरकार आता काय कारवाई करणार? असा देखील प्रश्न विचारला आहे.

कोरोनामुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिका प्रशासनाने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. प्रत्येक प्रकरणावर या समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता सुमारे ४५१ अशी प्रकरणे दरम्यानच्या काळात समोर आली आहेत, कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड दाखवली.

हे सर्व मृत्यू आयसीएमआरच्या निकषांनुसार कोरोनामुळे झालेले आहेत. ही बाब आता उघडकीस आली आहे. ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम केले. राज्य सरकारच्या वतीने या कमिटीवर काय कारवाई केली जाणार आहे, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला.

हे प्रकरण लपविण्यासाठी शासनाने एक पत्र पाठवून कोरोनासंदर्भातील सर्व आकडेवारी अपडेट करावी असे म्हटले आहे. ही माहिती तातडीने पाठविण्यास सांगण्यात आले आहे. असले प्रकार करून झालेला प्रकार लपविला जात असल्यामुळे तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिकेच्या समितीने आयसीएमआरच्या गाइडलाइन्स डावलून कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. ही बाब आता आयसीएमआरकडून निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून ३५६ अपात्र ठरविलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे ४५१ मृत्यू हे कोरोनामुळे झाले आहेत आणि आता ते पोर्टलवर तात्काळ नोंदविले गेले पाहिजेत. असे आयसीएमआरने सांगितले आहे.

विविध रुग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले असल्याची ५०० प्रकरणे आहेत. पण ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे ती प्रकरणे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणाऱ्यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

लोकांना सजग करण्याचा पारदर्शिता हा एकमेव मंत्र आहे. जनतेपर्यंत कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे पोहचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता मुंबईत सुमारे ९५० वर अधिकचे मृत्यू हे कोरोनामुळे झालेले आहेत. हा सर्व प्रकार गंभीर असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

Leave a Comment