भारतीय दुतावासातील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानाकडून प्रचंड छळ


नवी दिल्ली – काल पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या कर्मचाऱ्यांची पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तब्बल १२ तास कसून चौकशी केली व त्यांचा प्रचंड छळ केला. या कर्मचाऱ्यांना उच्चायुक्त कार्यालयाजवळील पेट्रोल पंपावरुन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिली.

१५ ते १६ सशस्त्र सुरक्षारक्षक पाकिस्तानी वेळेनुसार सकाळी ८.३० च्या सुमारास सहा गाडयांमधून उतरले आणि या दोन कर्मचाऱ्यांना गाडीत बसवून आपल्यासोबत घेऊन गेले. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. भारतीय दूतावासातील या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या डोळयावर पट्टी बांधण्यात आली होती व त्यांना बेडया घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दहा मिनिटात एका अज्ञातस्थळी नेण्यात आले. त्यांची तिथे सहा तास चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना रॉडने आणि लाकडी काठीने मारहाण करण्यात आली, तसेच अत्यंत घाणेरडे पाणी प्यायला लावले. पाकिस्तानने त्यांच्यावर उच्चायुक्त कार्यालयातील प्रत्येक अधिकाऱ्याची काय भूमिका आहे? तो कसा काम करतो याची माहिती देण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

दरम्यान या कर्मचाऱ्यांच्या गाडीने दुतावासाजवळ एका पादचाऱ्याला धडक दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमध्ये देण्यात आले होते. उच्चायुक्त कार्यालयातील अन्य सदस्यांना भविष्यात सुद्धा अशीच वागणूक दिली जाईल, अशी धमकी त्यांनी दिल्याचे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. भारतीय दुतावासातील कर्मचारी बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून तात्काळ पावले उचलण्यात आल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास या कर्मचाऱ्यांना भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडे सोपवण्यात आले.

Leave a Comment