राज्यातील 5071 कोरोनामुक्त रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढत असतानाच राज्यातील नागरिकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पंधरा दिवसांच्या अंतराने राज्यात दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात काल दिवसभरात 5 हजार 71 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई विभात सर्वाधिक 4242 एवढ्या कोरोनामुक्त रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यभरात आतापर्यंत 56 हजार 49 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यापूर्वी राज्यात 29 मे रोजी एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर काल पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

काल डिस्चार्ज देण्यात आलेल्या 5071 रुग्णांमध्ये मुंबई विभागात 4242 (आतापर्यंत एकूण 39 हजार 976) तर त्यापाठोपाठ पुणे विभागात 568 (आतापर्यंत एकूण 8430), नाशिक विभागात 100 (आतापर्यंत एकूण 2365), औरंगाबाद विभाग 75 (आतापर्यंत एकूण 1945), कोल्हापूर विभाग 24 (आतापर्यंत एकूण 1030), लातूर विभाग 11 (आतापर्यंत एकूण 444), अकोला विभाग 22 (आतापर्यंत एकूण 1048), नागपूर विभाग 29 (आतापर्यंत एकूण 811) रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment