मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने लाखाचा टप्पा पार केल्यानंतर सगळ्याच प्रसार माध्यमांनी राज्याची ही ब्रेकिंग न्यूज दाखवण्यास सुरुवात केली. पण याच ब्रेकिंग न्यूजनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्याचबरोबर माध्यमे अर्धवट बातम्या दाखवत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे.
गुजरातचा मृत्युदर सांगा की!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2020
प्रसार माध्यमांमध्ये राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगितला जातो. पण त्यातील ५० हजार रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगण्याचे आवर्जून टाळले जाते. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट असल्याचा आरोप करतानाच माध्यमांनी जर गुजरातचा मृत्युदर सांगा की, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी कोरोनाच्या 3390 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात काल 1632 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 978 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर एकाच दिवशी 120 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा मृतांचा आकडा 3950 वर पोहोचला आहे.