मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत होणार मोठा निर्णय


मुंबई : कोरोना या जीवघेण्या व्हायरसची साखळी तोडण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली आणि कधीही न थांबणारी देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकलसेवा शांत झाली. पण आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात शिथिल देण्यात आल्यानंतर मुंबईतील लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली असून तशी मागणीही महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी लोकल सुरू व्हावी, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लोकल सेवा कशी उपयुक्त आहे, याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, लोकल सेवा सुरू करण्याबाबतची आपली भूमिका याआधीच केंद्र सरकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कळविली आहे. सध्या याबाबत रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुरू असून लोकल सेवा सुरू केली तर ती कोणत्या स्वरूपात असावी याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मुंबई लोकल पुन्हा सुरू झाल्यास अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment