नोमुराच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार देशातील ‘डेंजर झोन’मध्ये, पुन्हा लागू होऊ शकतो लॉकडाउन


नवी दिल्ली – मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभमूीवर लॉकडाऊनमध्ये असलेला देश आता अनलॉक होऊ लागला आहे. त्यातच अशा परिस्थितीत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन अनलॉक करण्याचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता आहे. भारताच्या काळजीत भर टाकणारे निष्कर्ष एका संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील ४५ अर्थव्यवस्थांचा जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेने अभ्यास केला आहे. भारत ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे यात म्हटले आहे. कोरोनाचा उद्रेक पुन्हा भारतात होण्याची भीती असल्यामुळे पुन्हा एकदा भारतात लॉकडाउन लागू होऊ शकतो, असे नोमुराने म्हटले आहे.

कोरोनाचा शिरकाव देशात झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाउन लागू केला होता. देशातून लॉकडाउन अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर शिथिल करण्यात येत आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भारताच्या चिंतेत जपानमधील नोमुरा या संस्थेने केलेल्या अभ्यासामुळे भर पडली आहे. जगातील सर्वात मोठ्या ४५ अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची श्रेणी निहाय नोमुरानो आपल्या संशोधनात विभागणी केली आहे. यात पहिली श्रेणी ऑन ट्रॅक, दुसरी वॉर्निंग साइन व तिसरी डेंजर झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नोमुराने केलेल्या अभ्यासानुसार लॉकडाउन हटवल्यामुळे देशात दोन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते.


लॉकडाउन शिथिल केल्यानंतर लोकांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढेल. दररोज काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू शकते. पण, लोकांची भीती कमी होईल. त्यामुळे व्यवसाय सुरू होतील, जनजीवन पूर्वपदावर येईल. कोरोनाबाधितांची संख्या जसजशी कमी होईल, तसे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

लॉकडाऊन शिथिल करुन अर्थव्यवस्थेला चालना देतानाच कोरोनाचे संक्रमण वाढत जाईल. त्याचबरोबर कोरोनाबाधितांची संख्याही वाढत जाईल. यामुळे लोकांच्या मनात भीती वाढेल आणि जनजीवन पुन्हा विस्कळीत होईल. अंत्यत गंभीर स्थिती लॉकडाउन पुन्हा लादला जाऊ शकतो, असा निष्कर्ष नोमुराच्या अभ्यासात मांडण्यात आला आहे.

Leave a Comment