अखेर आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण विभागाचे नामकरण


मुंबई – मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या पर्यावरण विभागाचे नामकरण करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण विभाग आता यापुढे ‘पर्यावरणीय व वातावरणीय विभाग’ असा ओळखला जाणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री समजंय बनसोडे यांनी शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनी नावात बदल करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. फक्त त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज होती. त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पर्यावरण विभाग पर्यावरणीय व वातावरणीय विभाग या नावाने ओळखले जाईल. तसेच पर्यावरणीय व वातावरणीय विभाग पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर काम करेल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.


रब्बी गहू खरेदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला आला असता त्यावर आक्षेप घेण्यात आला. एका ज्येष्ठ मंत्र्याने संबंधित विभागाच्या मंत्र्याची स्वाक्षरी नाही तरीही प्रस्ताव चर्चेला कसा आला, असा सवाल केला. यावर काही मंत्र्यांनी आपल्याला विश्वासात न घेताच परस्पर विषय मंत्रिमंडळापुढे मांडले जातात, असे निदर्शनास आणले. खात्याचे सचिव परस्पर निर्णय घेऊन टिप्पणी सादर करतात, असाही तक्रारीचा सूर लावण्यात आला.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मंत्र्यांना अंधारात ठेवून परस्पर निर्णय घेण्याची ही प्रथा चुकीची असल्याचे निदर्शनास आणले. सरकार आणि मंत्रिमंडळाच्या कामकाजाबाबत नियमावली आहे. यानुसारच पालन व्हावे, अशी मागणी मंत्र्यांकडून करण्यात आली. मुख्य सचिव व काही सचिवांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. अखेर मंत्र्याची स्वाक्षरी नसलेला प्रस्ताव मागे घेण्यात आला.