सरकारी कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश


मुंबई :निवडक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाज सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर आता आठवड्यातून किमान एक दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा आठवड्यातून एक दिवसही कार्यालयात हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण आठवड्याची गैरहजेरी लागणार असल्याचे आदेश आज राज्य सरकारने जारी केले.

महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी ८ जूनपासून करण्यात येणार आहे. कर्मचारी परस्पर गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात कार्यालयात येत नसल्याचे निदर्शनास आले. काही जण तर मुख्यालय सोडून गावी गेल्याचे कळाल्यामुळे जे निवडक कर्मचारी शासकीय कार्यालयात हजर राहतात, त्यांच्यावरच अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश काढला आहे.

कर्मचारी जर ठरलेल्या दिवशी कामावर आला नाही तर संबंधित कर्मचाऱ्याची त्या आठवड्याची गैरहजेरी लावण्यात येणार असून ती विनावेतन रजा समजली जाणार आहे. त्यामुळे या दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. शासकीय कामाप्रति सरकारी कर्मचाऱ्यांनी निष्ठा ठेवणे अनिवार्य असून कार्यालयातील कामाचे कर्मचारी निहाय समन्वायी वाटप होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे निर्देश दिल्याचे आदेशात म्हटले आहे.

Leave a Comment