राज्यातील जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित


मुंबई : राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगाकडे नुकतीच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान राज्यात घेण्यात येणाऱ्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील 12 हजार 668 ग्रामपंचायतींची जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबीं करता मोठा वेळ लागतो. या निवडणुका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील 6 महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत विनंती राज्य शासनातर्फे राज्य निवडणुक आयोगास केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या विनंतीस प्रतिसाद देत कळविले आहे की, 17मार्च 2020 रोजीच्या निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. 5 वर्षांची मुदत ज्या ग्रामपंचायतींची संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच वेळोवेळी राज्य निवडणूक आयोग परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याबाबत व निवडणूका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.

Leave a Comment