निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर सावधगिरी


मुंबई – तीन जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पोहोचणार असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग या वादळास तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयारीत असून समुद्रातून मच्छिमारांनाही बोलावून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्हीसीद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा करून या चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या काही तुकडयाही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. एनडीआरएफच्या १६ तुकडयांपैकी १० तुकडया या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या सहा तुकडया राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणूऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. २४ तास नियंत्रण कक्ष मंत्रालयात देखील सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्चा घरात राहत असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनीही आवश्यक खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन केले आहे. पुरेशा मनुष्यबळासह महानगरपालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील संभाव्य धोके पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करुन तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment