देशात तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस प्रगतीपथावर; पण, लोकांपर्यंत तात्काळ पोहचणे अवघड


नवी दिल्ली : देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात या महामारीचा बिमोड करण्यासाठी देशात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच देशात तयार होत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनाला यश येत असल्याची माहिती नीती समितीचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. देशातील खासगी प्रगोयशाळेत आठ प्रकारच्या लसींवर तर, सरकारी प्रयोगशाळेत सहा प्रकारच्या लसींवर काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण, ही लस तयार झाली तरी लोकांपर्यंत तात्काळ पोहचणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पॉल यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीवर खासगी संस्था आणि कंपनी काम करत आहेत. यामधील चार लसींवर चांगल्या प्रकारे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर, सरकारी प्रयोगशाळेत सुरू असलेल्या दोन-तीन लसींचे काम बरेच पुढे गेले आहे. पण, या लसींवर कोणत्या टप्प्यात काम सुरू आहे, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. त्याचबरोबर कोरोना औषधांवरही काम सुरू असल्याचे डॉ. पोल यांनी सांगितले. कोरोना महामारी विरोधात या स्वेदशी औषधांचा वापर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्या औषधांवर काम सुरू आहे, त्यात Feviperasir, ACQH, BCG Vaccine, Micro Bacterium, Arbidol आणि हाइड्रोक्सी क्लोरोक्विन (HCQ) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य काही औषधांवर प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्लाझ्मा थेरपीचा देखील यात समावेश आहे. पण लस तयार झाल्यानंतर ती तात्काळ लोकांपर्यंत पोहचेल की नाही, हे लगेच सांगणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या तुलनेत भारतात वॅक्सीन तयार करण्याची क्षमता जास्त असल्याचे सरकारचे मुख्य शास्त्रज्ञ सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांनी सांगितले आहे. सध्याची परिस्थिती पाहात लवकर लस तयार होणे गरजेचे असल्याचे राघवन म्हणाले.

कोरोनाच्या या संकटात यावर अनेक प्रकारच्या लसींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. याला मोठा खर्च येणार आहे. देशातील जवळपास 30 संस्था कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे राघवन यांनी सांगितले. यात मोठ्या कंपन्यांपासून अगदी स्टार्टअप कंपन्यांचाही समावेश आहे. तर, काही कंपन्यांनी विदेशी कंपन्यांसोबत हातमिळवणी केल्याचे त्यांनी सांगितले. पण, जोपर्यंत यावर लस अथवा औषध येत नाही, तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून या आजाराला दूर ठेवावे लागेल, असा सल्लाही राघवन यांनी दिला.

Leave a Comment