उद्धव ठाकरेंचे संकेत; ३१ मे नंतर लॉकडाऊन उठेल या भ्रमात राहू नका


मुंबई: मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपण उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून राज्यातील स्थितीचा काल मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी 31 मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बऱ्यापैकी व्यवहार ग्रीन झोनमध्ये सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. पण यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. हे व्यवहार नियम व अटींचे उल्लंघन केल्यास बंद केले जातील याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

८० टक्के लोकांमध्ये आज कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे रुग्ण ज्या जिल्ह्यांत नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते हे लक्षात घेऊन कोरोनाचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिले. यावेळी सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील सांगितले. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील महत्वपूर्ण सूचना दिल्या.

राज्यातील रुग्ण संख्या मोठी असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्य देखील वाढत आहे. फिल्ड हॉस्पिटल, पल्स ऑक्सीमीटरचा वापर, प्लाझ्मा थेरपी, ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे, शंभर टक्के कॅशलेस उपचार, व इतर काही गोष्टी प्रभावी ठरत आहेत. महाराष्ट्र यात देशात उदाहरण निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, अतिशय तळमळीने तुम्ही सर्वच जण रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात पण माझ्या दृष्टीने आता आकडेवारीपेक्षा तुम्ही रुग्णांना काय सुविधा देत आहात, त्यांना कसे बरे करत आहात, उपचारांचे कसे नियोजन केले आहे याला महत्व आहे.

संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासावी, रक्तदाबाकडे लक्ष ठेवावे. चाचणी ही लक्ष्य केंद्रित असावी. मोठ्या प्रमाणावर घराघरांत सर्वेक्षण करून कोरोनाबाधित शोधणे खूप महत्वाचे आहे. रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याबाबत कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

लॉकडाऊन आपण हळूहळू शिथिल करीत आहोत. तो एकदम उठविणे अयोग्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, खूप काळजी घेऊनही स्थलांतरित व प्रवास करणाऱ्या लोकांमुळे रुग्ण संख्या वाढते आहे. ग्रामीण भागात देखील बेड्सची मागणी वाढत आहे. आपण कालच मान्सून पूर्व बैठक घेतली. पावसाळ्यातील साथ रोगांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. पुढच्या १० दिवसांत ऑनलाईन शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट सुरु करता येतील का हे पाहावे लागेल. पावसाळ्यापूर्वी काही चित्रपट व मालिका निर्माते यांना आपण ग्रीन झोन्समध्ये बाह्य चित्रीकरण करू देऊ शकतो का तेही पाहावे लागेल.

लॉकडाऊन सुरु करतांना ट्रायल पद्धतीने केले पाहिजे. काय काय सुरु करतो आहोत त्याविषयी नागरिकांमध्ये स्पष्ट कल्पना पूर्वीपासून असावी. त्यात अटी शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्या नाहीत तर परत लॉकडाऊन करावा लागेल याची कल्पना असणे गरजेचे आहे म्हणजे संभ्रम राहणार नाही. चेस दि व्हायरसची रणनीती मुंबईत परिणामकारक दिसू लागली आहे. ती तशीच राज्यात इतरत्रही राबविली गेली पाहिजे. ती मोहीम खूप गांभीर्याने घ्यावी लागेल. टास्क फोर्सने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वेही राज्यातील सर्व रुग्णालयांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील यावेळी प्रतिकार शक्ती आपण कशी वाढवतो, रुग्णांना त्यादृष्टीने सुविधा कशा देतो ते महत्वाचे असल्याचे सांगितले. आज कोरोना लढाईत निवासी डॉक्टर्सची मोठी फळी आघाडीवर आहे. ते डॉक्टर नवे आहेत. त्यांची देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे, सर्व संरक्षण साधने त्यांना पुरवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी १०४ हेल्पलाईन क्रमांक सुरु करीत असून रुग्णालये जास्त दर आकारत असतील तर नागरिकांना येथे तक्रार करता येईल, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या स्तरावरून अशा तक्रारींची दखल घ्यावी, त्यासाठी नोडल अधिकारी नेमावा. तसेच प्रत्येक रुग्णालयाने उपचारांच्या दरांचे फलक रुग्णालयाबाहेर लावणे गरजेचे आहे ते त्यांनी केले आहे का हे तपासणे गरजेचे आहे. रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स देखील आपण ताब्यात घेतले आहेत, पण त्याप्रमाणे तिथे अंमलबजावणी होते का ते प्रत्यक्ष पहावे, असे सांगितले.
.
काही जिल्ह्यांत नॉन कोविड रोग विशेषत: स्वाईन फ्ल्यू, डेंगी च्या प्रमाणात देखील वाढ होत असल्यामुळे यासाठी देखील त्वरित उपचारांची गरज आहे. आपण इंडियन मेडिकल असोशिएशनसोबतच्या चर्चेत सांगितले आहे की कोणताही रुग्ण आल्यास त्याला उपचारअगोदर कोविड प्रमाणपत्र आणण्याची सक्ती करता येत नाही. छोटी छोटी रुग्णालये जी विविध आजारांवर शत्रक्रिया करतात त्यांना कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करू नये अन्यथा इतर रोगांसाठी उपचाराला रुग्णालय शिल्लकच राहणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालिका उद्यापासून बेड्स आणि रुग्णवाहिका ऑनलाईन करत असल्याचे मुंबई पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी सांगितले. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तसेच डॉक्टरांची देखील मोठी सोय होईल. चेस दि व्हायरस मोहीम आपण राबवीत आहोत. प्रत्येक एका पॉझिटीव्ह रूग्णामागे आपण दररोज किती संपर्क शोधतो हे काळजीपूर्वक तपासले जाते व लगेच किती जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले, ते पाहिले जाते असे मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील वृत्ता झी 24 तास या वृत्त वाहिनीने दिले आहे.

Leave a Comment